Site Logo
पुणेमहाराष्ट्रसामाजिक

स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला गती

आपला राजस्तंभ न्यूज : प्रतिनिधी

गुरुवार १४ मे २०२६ ।। पुणेकरांना दिलासा देणारी एक महत्त्वपूर्ण  बाब समोर आली आहे  तर नशिबाचा भाग बनला आहे, सकाळी घरातून निघालेला माणूस संध्याकाळी ट्रॅफिकच्या कचाट्यातून कसाबसा घरी परततो, तेव्हा तो ऑफिसपेक्षा सिग्नलवरच जास्त वेळ घालवून आलेला असतो. विशेष म्हणजे स्वारगेट ते कात्रज हा मार्ग म्हणजे वाहनांच्या महासागरात अडकलेली पुण्याचा एक मध्यवर्ती भाग आहे ! पण आता या त्रासाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाने प्रत्यक्ष वेग घेतला असून, बोगद्याच्या पहिल्या ‘टीबीएम टनेल सेगमेंट’च्या कास्टिंगला सुरुवात झाली आहे. पुणे मेट्रोच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात कात्रजचा प्रवास भूमिगत वेगाने होणार असून, पुणेकरांना ट्रॅफिकच्या जंजाळातून मोठी सुटका मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. “रस्त्यावरची गर्दी कमी आणि वेळेची बचत जास्त” — या स्वप्नाला आता प्रत्यक्ष आकार येऊ लागला आहे.

५.४६ किलोमीटर लांबीच्या या भूमिगत मार्गासाठी  अत्याधुनिक ‘टीबीएम’ यंत्राद्वारे बोगदा खणला जाणार आहे. स्वारगेटपासून कात्रज पर्यंतचा हा प्रवास भविष्यात पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा दिलासा देणारा ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे. या मार्गावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज अशी स्थानके उभारली जाणार आहेत. म्हणजे दक्षिण पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला पहिल्यांदाच जलद आणि सुसज्ज मेट्रोची थेट जोडणी मिळणार आहे. बोगद्याच्या मजबुतीकरणासाठी तब्बल सहा हजार ९९३ रिंग तयार केल्या जाणार असून, प्रत्येक रिंग अत्यंत मजबूत ‘प्रीकास्ट आरसीसी सेगमेंट’ने तयार होणार आहे. या तांत्रिक तपशीलांकडे पाहिलं की, पुण्याच्या भूमिगत पोटात आता आधुनिक वाहतुकीची नवी नस बसवली जात असल्याचं स्पष्ट जाणवतं. ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पुणेकरांना मेट्रोचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन केलं आहे. कारण इंधनबचत, प्रदूषण नियंत्रण आणि वेळेची बचत — या तिन्ही गोष्टींचं उत्तर आता मेट्रोकडेच असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

मात्र पुण्याच्या विकासकथेत नेहमीप्रमाणे विरोधाभासही तितक्याच वेगाने समोर येतो आहे. एका बाजूला अत्याधुनिक मेट्रोचे बोगदे खणले जात असताना दुसऱ्या बाजूला शहरातील पथदिव्यांच्या कामात मोठ्या त्रुटी उघड झाल्या आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील चाळीसहून अधिक नव्या पथदिव्यांची चोरी झाली, केबल जोडणीत तांत्रिक चुका आढळल्या आणि ‘स्काडा’ अहवालातही गंभीर विसंगती समोर आल्या. त्यामुळे महापालिकेने ‘महाप्रीत’ कंपनीला चांगलंच फैलावर घेतलं आहे. म्हणजे पुण्यात विकासकामांचं चित्र आज दोन टोकांचं दिसतंय — एकीकडे भूमिगत मेट्रोचं आधुनिक स्वप्न, तर दुसरीकडे रस्त्यावरच्या दिव्यांचं अंधारात हरवलेलं वास्तव! तरीही स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिका पूर्ण झाली, तर पुण्याच्या वाहतुकीच्या इतिहासात हा एक मोठा टप्पा ठरणार यात शंका नाही. कारण पुणेकरांना आता फक्त आश्वासनं नकोत; त्यांना वेळेत धावणारी व्यवस्था हवी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button